फलटण तालुक्यातील नेत्यांनी गाजवला अमृत महोत्सवी सोहळा ; जनता आता कशी दाद देणार याकडे लक्ष
ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता आणि त्यांच्या पत्नी सौ. इंदूमती मेहता यांचा अमृत महोत्सवी नागरी सत्कार सोहळा आज फलटण शहरातील महाराजा मंगल कार्यालय येथे दिमाखात संपन्न झाला. या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते. एरव्ही एकमेकांचे कट्टर राजकीय विरोधक म्हणून ओळख असलेले, भाषणांमधून व पत्रकार परिषदांमधून एकमेकांवर कायम तोंडसुख घेणारे, असे सर्व प्रमुख राजकीय नेते एकमेकांशी कधी हास्य, विनोद, संवाद, गप्पागोष्टी, एकमेकांना टाळ्या देणे, चेष्टा, मस्करी करताना एकत्रित पाहायला मिळतील असे फलटणकरांना कधीही स्वप्नातही वाटले नसावे. पण फलटण तालुक्याचे ज्येष्ठ पत्रकार अरविंद मेहता यांनी त्यांच्या लेखणीच्या कार्य कर्तुत्वाने पत्रकारितेमध्ये अनेक किमया केलेल्या आहेत, तशाप्रकारे त्यांनी आपल्या अमृत महोत्सवी सोहळ्याच्या कार्यक्रमांमध्ये सर्व विरोधकांना एकत्र आणण्याची किमया देखील करून दाखवली.
कुरुक्षेत्रावर श्रीकृष्ण परमात्म्याने जेव्हा अर्जुनाला महाविराट विश्वरूप दर्शन दाखवले, तेव्हा अर्जुन गांगरून गेला होता. त्याप्रमाणेच अमृत महोत्सवी सोहळ्यातील हे अतिविराट चित्र पाहिल्यानंतर तशी काहीशी अवस्था फलटणकर जनतेची नक्कीच झाली आहे. आत्तापर्यंत फलटण तालुक्यातला राजकीय विरोध म्हणजे “लुटुपुटूच्या लढाया” होत्या की काय, असा संभ्रम देखील जनतेच्या मनात निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही. खेळीमेळीच्या वातावरणात निवडणुका झाल्याच पाहिजेत, खेळीमेळीच्या वातावरणात दर्जेदार राजकारण झालेच पाहिजे याबाबत कोणाचेही दुमत असू शकत नाही.
राजकारणात कोणताही आकस, राग, द्वेष भावना मनात न ठेवता, कायम एकमेकांशी सुसंवाद होणे हे खूप महत्त्वाचे आहे. विरोध हा वैचारिक असावा व तो जनतेच्या विकासासाठीचा असावा, अशा प्रकारचे दर्जेदार राजकारण होणे हे लोकशाही बळकट होण्यासाठी अपेक्षित असते. एकमेकांचे कट्टर विरोधक असलेल्या सर्व नेत्यांची राजकीय प्रगल्भता पाहून आता जनतेच्या मनात प्रश्न आहे की, फलटण तालुक्याच्या विकासाबाबत ही सर्व नेते मंडळी अशीच कायम एकत्रित येतील का ? काही असो पण फलटण तालुक्याच्या विकासाच्या दृष्टिकोनातून असे चांगले क्षण, असे चांगले दिवस, कायम फलटण तालुक्याला अनुभवायला मिळावेत हीच ईश्वरचरणी प्रार्थना.







