सातारा : जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यात महायुती करायची असेल तर पालकमंत्री असलेले शिवसेनेचे नेते शंभूराज देसाई यांनी पुढाकार घ्यावा आणि महायुतीची बैठक बोलवावी, आम्ही त्या बैठकीला हजर राहू असे भाजपकडून सांगण्यात आले होते. शंभूराज देसाई यांनी भाजपाच्या मतानुसार सातारा जिल्ह्यातील आठ आमदार आणि दोन्ही खासदार यांना बैठकीचं निमंत्रण दिलं होतं. परंतु जिल्ह्यात असून सुद्धा भाजपाचे आमदार आणि दोन्ही मंत्री बैठकीला आले नाहीत. पुढची भूमिका शिवसेना म्हणून आम्ही घेणार असल्याचे शंभूराज देसाई यांनी सांगितले.
एका बाजूला महायुती करण्यासाठी पालकमंत्र्यांनी पुढाकार घ्यावा, बैठक घ्यावी असं सांगायचं आणि इकडे बैठक सुरू असताना महायुती मधील दुसरे जबाबदार मंत्री यांनी पाटण मतदारसंघाबाबत महायुतीला तडे जातील अशी वक्तव्ये करायची. “पालकमंत्री कोणीही असू देत, आपल्याला फरक पडत नाही” असे वक्तव्य जयकुमार गोरे यांनी केल्यानंतर “घोडे मैदान लांब नाही, फरक पडतो की नाही हे लवकरच सिद्ध होईल” असं शंभूराज देसाई म्हणाले. मला त्यांच्यासारखी अहंपणाची किंवा डोक्यात सत्ता गेल्यासारखी भाषा करायची नाही आणि मी करणारही नाही. त्यांनी पाटणमधील जनतेला डबल पॅकेज द्यायचं किंवा नाही द्यायचं हा त्यांचा प्रश्न आहे, आणि पॅकेज म्हणजे नेमकं काय हे एकदाचे जयकुमार गोरे यांनी स्पष्ट सांगावं. असल्या कुठल्याही पॅकेजला माझ्या पाटण मतदारसंघातली जनता भाळणार नाही व भुलणारही नाही, असं शंभुराज देसाई यांनी सांगितले.
सत्यजीतसिंह पाटणकरांनी भाजपमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांच्या गटातील 102 गावातील 1966 प्रमुख कार्यकर्त्यांनी जाहीरपणे शिवसेनेत प्रवेश केला आहे. त्यामुळे अशी पॅकेजची भाषा माझ्या मतदारसंघाला लागू होणार नाही. तसेच महायुती धर्म पाळण्याचा आम्ही शिवसेना म्हणून निश्चित प्रयत्न करत आहोत. मात्र आमच्या मंत्रिमंडळातील एक जबाबदार मंत्री आपल्या सहकारी मंत्र्यांच्या संदर्भात “पालकमंत्री कोणीही असला तरी, फलटणचे पालकमंत्री हे रणजितसिंह नाईक निंबाळकर आहेत” असं जर बोलत असतील तर येणाऱ्या निवडणुकीत जयकुमार गोरे यांना शिवसैनिक आणि जनता उत्तर देईल, असं शंभूराज देसाई म्हणाले.
श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, नितीन काका पाटील, मकरंद आबा पाटील आम्ही एकत्र बसून चर्चा केली आहे. आम्ही एकत्र येण्यानं एवढ्या टोकाची भूमिका आमचे मित्र पक्ष घेत असतील तर सगळ्यांनी याचा विचार केला पाहिजे. लवकरच शिवसेना म्हणून आमच्या पक्षाची भूमिका आम्ही स्पष्ट करु, असं शंभूराज देसाई म्हणाले.






