भ्रष्ट व्यवस्थेचा बळी ठरलेल्या मृत डॉ. तरुणीला न्याय मिळणार का ?
फलटण : पीएसआय गोपाळ मदने व प्रशांत बनकर यांच्या त्रासाला वैतागून फलटण येथे गळफास घेऊन आत्महत्या कलेल्या व महाराष्ट्राची लाडकी बहीण म्हणून संबोधली जाणाऱ्या बहिणींपैकी एका डॉ. महिला भगिनीने मृत्यूपूर्वी न्याय मागत असताना आपल्या अर्जामध्ये असे म्हटले होते की पोस्टमार्टमचा रिपोर्ट बदलण्यासाठी तिच्यावर राजकीय दबाव होता. एकीकडे प्रामाणिकपणाने कर्तव्य बजावणारी डॉक्टर महिला व व एकीकडे तिला सर्व बाजूंनी घेरलेली लोकशाहीची यंत्रणा, ज्यामध्ये पोलीस विभागातील तिच्यावर अत्याचार करणारे अधिकारी, तिच्या न्याय्य मागणीकडे दुर्लक्ष करणारे आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी व राजकीय दबाव, अशा सर्व बाजूंनी घेरलेल्या चक्रव्यूहात अडकल्यामुळे डॉक्टर तरुणीने आत्महत्या करून आपला शेवट केल्याचे प्रथमदर्शनी दिसून येत आहे.
या दुर्दैवी घटनेने निराश झालेली फलटण सह महाराष्ट्रातील संतप्त जनता आता विचारत आहे की लोकशाहीचे भान हरपलं आहे का ? खऱ्याचं खोटं आणि खोट्याचं खरं करण्यासाठी लोकशाहीची यंत्रणा आहे का ? राजकीय क्षेत्र, राजकीय सत्ता, राजकीय पद, पोलीसी वर्दी, आरोग्य विभागातील वरिष्ठ अधिकारी यातली माणूसकी संपली आहे की काय असं वातावरण फलटणसह महाराष्ट्रातील लोकशाहीत निर्माण झालेलं या दुर्दैवी घटनेवरुन दिसतं आहे. एक जबाबदार माणूस म्हणून आपण वागणार कधी ? या मृत डॉक्टर तरुणीला लहानाचं मोठं करण्यासाठी व लाखो रुपये खर्च करून वैद्यकीय क्षेत्रात डॉक्टर करण्यासाठी तिच्या शेतकरी व गरीब कुटुंबातील मातापित्याने काय खस्ता खाल्ल्या असतील, किती प्रेमाने व मायेने तिला लहानाचं मोठं केलं असेल, याची साधी जाणीव तरी या लोकशाही यंत्रणेला आहे का ? असा प्रश्न जनता विचारू लागली आहे.
मुलं सर्वांनाच आहेत, कुटुंब सर्वांनाच आहे. आपल्या कुटुंबातील सदस्याला त्रास झाला तर आपल्याला तो सहन होत नाही, ही साधी संवेदनशील माणुसकीची जाणीव आहे. प्रत्येकाला जगण्याचा अधिकार आहे, आपलं मत व्यक्त करण्याचा अधिकार आहे, कोणालाही लाथाडू नका. ज्याचं जळतं त्यालाच कळतं. माणसाचं मन आणि त्याचा जीव याचा आत्मसन्मान राखला गेलाच पाहिजे, अन्यथा मनुष्य म्हणून जन्माला आलेल्या आपल्या सर्वांच्या जगण्याला काय अर्थ आहे ? अशी चर्चा फलटण तालुक्यासह संपूर्ण महाराष्ट्रात सर्वत्र सुरू असल्याचं सोशल मीडियाद्वारे पहावयास मिळत आहे.
आता खरी कसोटी आहे ती पोलिसांची. पोलिसांच्यात खरंच माणूसकी असेल तर त्यांनी आपल्या एका मृत लाडक्या बहिणीला न्याय मिळवून देण्यासाठी सर्व दोषींची नावे समोर आणण्याचे कर्तव्य व जबाबदारी पोलीस पार पाडणार का ? तसेच नातेवाईकांच्या मागणीनुसार यामध्ये दोषी असणाऱ्या पोलीस अधिकाऱ्यास फासावर लटकवण्यापर्यंतचे कर्तव्य पोलीस पार पाडणार का ? “सातारा जिल्हा, कायद्याचा बालेकिल्ला” आहे का ? जनतेच्या मनात विविध प्रश्नांनी संभ्रम निर्माण झालेला असुन कायद्याविषयी व लोकशाही विषयी शंका निर्माण होत आहे. डॉ. तरुणीच्या मृत्यूने कासावीस झालेली फलटणसह महाराष्ट्रातील जनता न्यायाची वाट पाहत आहे.
नागरिक जनतेच्या मुलभूत अधिकाराचे, स्वातंत्र्य, हक्काचे व जीविताचे रक्षण करण्यासाठीच भारत देशाने लोकशाहीचा स्वीकार केला आहे, त्यानुसार कायद्याची अंमलबजावणी व्हावी हीच जनतेची माफक अपेक्षा आहे.







