फलटण : निवडणुकीच्या प्रचार सभांमध्ये गर्दी करण्यापेक्षा शेतकरी फलटणकरांनी उच्चांकी ऊस दर मिळवण्यासाठी शेतकरी नेत्यांच्या सभेला उपस्थित का राहू नये, शेतकऱ्यांनी याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. आज सोमवार दिनांक 24 नोव्हेंबर रोजी शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी साखरवाडी मध्ये शेतकऱ्यांना उच्चांकी ऊस दर मिळावा याकरिता शेतकऱ्यांसाठी जाहीर सभा घेत आहेत. त्या ठिकाणी फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांनी स्वतःसाठी व स्वतःच्या कुटुंबासाठी मोठ्या संख्येने उपस्थित राहून राजू शेट्टी यांचे बळ वाढवणे हे शेतकऱ्यांसाठी आवश्यक नाही का. कोणीही नेता असो, कोणत्याही पक्षाचा वा गटाचा असो, जो फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी, येथील जनतेच्या हितासाठी आवाज उठवत असेल तर त्यावेळी नागरिकांनी, शेतकऱ्यांनी प्रचंड मोठ्या प्रमाणात संघटित होऊन संबंधित नेत्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे आवश्यक व अपेक्षित आहे. आपलं हित आज शेतकरी सभेत सहभागी होण्यात आहे हे फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या लक्षात आलं पाहिजे असे महत्त्वाचे आवाहन प्रजा गटाचे अध्यक्ष प्रदीप झणझणे यांनी शेतकरी जनतेच्या हितासाठी केले आहे. तसेच आधी उच्चांकी ऊस दर जाहीर करा, नंतरच प्रचाराची धुरा सांभाळा अशी ठाम भूमिका कारखान्यांबाबत शेतकऱ्यांची असली पाहिजे.







