प्रदीप झणझणे यांचा कामगारांच्या मागणीला जाहीर पाठिंबा
श्रीराम सहकारी साखर कारखान्यावरील स्थगिती तात्काळ उठवून कारखाना पुन्हा सुरू करण्यात यावा, या कामगारांच्या मागणीला प्रजा गटाच्या वतीने प्रदीप झणझणे यांनी जाहीर पाठिंबा दिला आहे. कारखाना दीर्घकाळ बंद राहिल्यास शेकडो कामगार व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ येऊ शकते, तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेलाही मोठा फटका बसू शकतो, अशी भूमिका त्यांनी मांडली.
फलटण : कामगारांच्या न्याय्य मागण्यांसाठी प्रजा गट त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. तसेच शासनाने संवेदनशील भूमिका घेत कारखान्याचा प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावावा, अशी मागणीही प्रजा गटाच्या वतीने करण्यात आली.
श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या प्रश्नावर राजकीय घडामोडींना वेग आला असताना, त्याची सर्वाधिक झळ मात्र सामान्य कामगार आणि त्यांच्या कुटुंबीयांना बसत असल्याचे चित्र सध्या पाहायला मिळत आहे. एका बाजूला आरोप-प्रत्यारोप, बैठका आणि राजकीय भूमिका यांची चर्चा रंगत असताना, दुसऱ्या बाजूला रोजच्या मजुरीवर संसार चालवणाऱ्या सहाशे ते सातशे कामगारांच्या घरातील चूल पेटवण्याचा प्रश्न अधिक गंभीर बनला असल्याचे प्रजा गटाचे अध्यक्ष प्रदीप झणझणे यांनी सांगितले.
कारखाना बंद असल्याने अनेक कामगारांचे नियमित उत्पन्न थांबले असून, घरखर्च, मुलांचे शिक्षण, आरोग्य आणि दैनंदिन गरजा भागवणे कठीण झाले आहे. काही कुटुंबांवर तर आर्थिक संकट इतके गडद झाले आहे की उद्याचा दिवस कसा जाईल, याचीही चिंता त्यांना सतावत असल्याचे प्रजा गटाच्या वतीने कामगारांच्या भावना प्रदीप झणझणे यांनी व्यक्त केल्या.
कारखाना हा केवळ उद्योग नसून हजारो कुटुंबांच्या उपजीविकेचा आधार आहे. त्यामुळे या प्रश्नाकडे केवळ राजकीय दृष्टीकोनातून न पाहता मानवी संवेदनांच्या दृष्टीने पाहण्याची गरज फलटणकर जनतेतून व्यक्त होत आहे. कारखान्यावरील स्थगिती लवकर उठवून तो पुन्हा सुरू झाल्यास शेकडो कामगारांच्या घरातील चूल पुन्हा पेटू शकेल आणि स्थानिक अर्थचक्रालाही नवसंजीवनी मिळू शकेल, अशी अपेक्षा कामगार आणि नागरिकांकडून व्यक्त केली जात असल्याची माहिती प्रदीप झणझणे यांनी दिली.
आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे किंवा सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यापैकी कोण पुढाकार घेऊन श्रीराम कारखाना आणि कामगारांचा प्रश्न मार्गी लावणार आहे की नाही, याची उत्सुकता फलटणकर जनतेमध्ये वाढली आहे.






