सांगली-सातारा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार अभयसिंह जगताप यांनी भाजपच्या कार्यपद्धतीवर जोरदार टीका करत, “माझी विधान परिषदेची ही लढाई भाजपातील एका मंत्र्याविरोधात आहे,” असे स्पष्टपणे सांगितले. विशेष म्हणजे, त्यांनी कोणाचेही नाव न घेता ग्रामविकासमंत्री जयकुमार गोरे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधल्याची राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.
सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलताना जगताप म्हणाले की, जिल्ह्यात सध्या सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील लोकप्रतिनिधींमध्ये मोठ्या प्रमाणावर दुजाभाव केला जात आहे. भाजपशी संबंधित नसलेल्या जिल्हा परिषद सदस्यांना तसेच नगरपालिकेतील नगरसेवकांना विकासकामांसाठी आवश्यक निधी मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला. त्यामुळे अनेक भागांतील विकासकामे रखडली असून, सर्वसामान्य जनतेलाही त्याचा फटका बसत असल्याचे त्यांनी नमूद केले.
अभयसिंह जगताप यांनी पुढे दावा केला की, केवळ विरोधी पक्षाचेच नव्हे तर भाजपमधील अनेक नगरसेवक आणि जिल्हा परिषद सदस्यांनाही स्वतंत्रपणे काम करण्याचे स्वातंत्र्य व आवश्यक अधिकार दिले जात नाहीत. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये लोकप्रतिनिधींची भूमिका दुय्यम ठरत असून, निर्णय प्रक्रियेवर काही मोजक्या व्यक्तींचे वर्चस्व निर्माण झाल्याची परिस्थिती असल्याची टीकाही त्यांनी केली.
या पार्श्वभूमीवर आपली उमेदवारी ही केवळ एका राजकीय पक्षाविरोधातील नसून अन्यायकारक आणि केंद्रीकृत कार्यपद्धतीविरोधातील लढा असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या स्वाभिमानासाठी तसेच लोकप्रतिनिधींना समान न्याय मिळावा, या उद्देशाने आपण निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याचे जगताप यांनी सांगितले.
यावेळी त्यांनी मतदार प्रतिनिधींना पक्षीय दबावाला बळी न पडता लोकशाही मूल्यांचा विचार करून मतदान करण्याचे आवाहन केले. या निवडणुकीत स्वाभिमानाचा मुद्दा महत्त्वाचा ठरणार असून, अनेक लोकप्रतिनिधी आपल्याला पाठिंबा देतील, असा विश्वासही अभयसिंह जगताप यांनी व्यक्त केला.
सातारा येथे शुक्रवारी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी डॉ. प्रशांत गोडसे, तानाजी वायदंडे, विजय शेटे, अजय सानप, नितीन घाटगे, माजी सरपंच विजयकुमार जगताप, संजय जगताप, दिलीप खरात, किरण खवळे यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते.







