सत्तेत सहभागी असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील महत्त्वाचे पद असलेल्या फलटण तालुका उपाध्यक्ष पदावर पाणी सोडून वंचित बहुजन आघाडीत प्रवेश करण्याचा निर्णय हा निवृत्ती खताळ यांचा धाडसी आणि चर्चेचा विषय ठरला आहे. राजकीय सत्तेची समीकरणे, पदे आणि संधी यांचा यत्किंचितही विचार न करता आपल्या वैचारिक भूमिकेला प्राधान्य देत त्यांनी वंचितमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. सत्ताधारी पक्षाच्या तालुका उपाध्यक्ष पदाचा राजीनामा देऊन नव्या राजकीय वाटचालीची निवड केल्याने फलटण तालुक्यात चर्चेला निश्चितच वाव मिळाला आहे.
फलटण : राष्ट्रवादी काँग्रेसचे फलटण तालुका उपाध्यक्ष निवृत्ती अशोक खताळ यांनी आपल्या शेकडो समर्थक व कार्यकर्त्यांसह वंचित बहुजन आघाडीत जाहीर प्रवेश करत नव्या राजकीय वाटचालीची सुरुवात केली. हा पक्षप्रवेश सोहळा वंचित बहुजन आघाडीचे लातूर महानगरपालिका गटनेते अमोल लांडगे, सातारा जिल्हा निरीक्षक अभय बनसोडे आणि जिल्हाध्यक्ष रामदास कांबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
पक्षप्रवेशानंतर बोलताना निवृत्ती खताळ यांनी आगामी फलटण तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुका पूर्ण ताकदीने लढविणार असल्याचे सांगितले. तसेच वंचित बहुजन आघाडीची विचारधारा तालुक्यातील प्रत्येक गावातील घराघरापर्यंत पोहोचविण्यासाठी शंभर टक्के प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी त्यांनी सांगितले की, श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक न्यायाच्या विचारांना वंचित बहुजन आघाडीच्या माध्यमातून फलटण तालुक्यातील गावोगावी पोहोचवून सर्व वंचित घटकांना एकत्र आणण्याचे काम केले जाईल. समाजातील प्रत्येक घटकाला सन्मान मिळवून देत आगामी काळातील सर्व निवडणुका ताकदीने लढविण्याचा निर्धारही त्यांनी व्यक्त केला.
या पक्षप्रवेश सोहळ्यास वंचित बहुजन आघाडीचे अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. त्यामध्ये सरचिटणीस सुनील कदम, जिल्हा उपाध्यक्ष सुभाष गायकवाड, अरुण गायकवाड, जीवन धोंडगे, अमोल गायकवाड, योगेश वांजळे, प्रकाश गायकवाड, सुरेश कांबळे, स्वप्नील बनसोडे, जगन्नाथ वाघमारे, नितीन भोसले यांच्यासह विविध पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा समावेश होता.
निवृत्ती खताळ यांच्या प्रवेशामुळे फलटण तालुक्यात वंचित बहुजन आघाडीची संघटनात्मक ताकद वाढण्यास निश्चितच मदत होईल, असा विश्वास उपस्थित पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला. तर स्वतः खताळ यांनीही पक्षाच्या ध्येयधोरणांना जनसामान्यांपर्यंत पोहोचवत तालुक्यात वंचित बहुजन आघाडी अधिक सक्षम करण्याचा संकल्प यावेळी जाहीर केला.






