फलटण : राज्यातील विधान परिषद निवडणुका बिनविरोध होण्याची वाढती प्रवृत्ती ही महाराष्ट्राच्या समृद्ध लोकशाही परंपरेस भूषणावह नसल्याची प्रतिक्रिया प्रजा गटाचे अध्यक्ष प्रदीप झणझणे यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्राने नेहमीच वैचारिक राजकारण, सशक्त विरोधी भूमिका आणि लोकशाही मूल्यांची परंपरा जपली आहे. अशा राज्यात विधान परिषदेसारख्या महत्त्वाच्या लोकशाही संस्थेच्या निवडणुका बिनविरोध होणे ही चिंतेची बाब असल्याचे झणझणे यांनी म्हटले आहे.
ते म्हणाले, “ग्रामपंचायतींच्या निवडणुका गावाच्या विकासासाठी अनेकदा सर्वानुमते बिनविरोध होतात. मात्र विधान परिषद ही राज्याच्या धोरणांवर चर्चा करणारी आणि सरकारला जाब विचारणारी महत्त्वाची संस्था आहे. अशा संस्थेतील निवडणुका स्पर्धात्मक होणे हे लोकशाहीच्या दृष्टीने आवश्यक आहे.”
बिनविरोध निवडीमुळे लोकशाहीतील राजकीय स्पर्धा, विचारांचे प्रतिनिधित्व आणि मतदारांपुढे पर्याय ठेवण्याची प्रक्रिया कमकुवत होण्याचा धोका आहे . तसेच लोकशाही अधिक सक्षम करण्यासाठी निवडणुकांमध्ये निरोगी स्पर्धा आणि विविध मतप्रवाहांना संधी मिळणे गरजेचे असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
“विधान परिषदाही ग्रामपंचायतीप्रमाणे बिनविरोध होणे हे महाराष्ट्राच्या लोकशाही परंपरेला शोभणारे नाही. लोकशाहीचे सौंदर्य हे स्पर्धेत, विचारांच्या संघर्षात आणि जनतेसमोर पर्याय उपलब्ध करून देण्यात आहे,” असे प्रदीप झणझणे यांनी स्पष्ट केले.







