कोरेगाव तालुक्यातील सोळशी ग्रामस्थांचा आंदोलनाचा इशारा
सोळशी गावातील दिगंबर श्रीरंग चव्हाण यांच्या वस्तीवरील घराशेजारील रोडलाईटचे दोन खांबावरील बल्ब मागील एक महिन्यांपासून बंद अवस्थेत असल्याची दिगंबर चव्हाण यांची तक्रार आहे. सोळशी ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्याकडे पाठपुरावा करून देखील बल्ब चालू होत नसल्यामुळे आपल्यावर अन्याय होत असल्याच्या भावनेने दिगंबर चव्हाण व ग्रामस्थ हे व्यथित झाले आहेत. सोळशी ग्रामपंचायतीचे सरपंच यांच्याकडे चव्हाण यांनी पाठपुरावा केला असता त्यांनी घरपट्टी थकीत असल्याचे कारण पुढे केल्याची माहिती दिगंबर चव्हाण यांनी दिली आहे.
कोरेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी यांच्याकडे पाठपुरावा करून देखील रोडलाईट चालू होत नसल्याचे दिगंबर चव्हाण यांची सांगितले आहे. घरपट्टी थकीत असल्याचे कारण सरपंच व गटविकास अधिकारी यांच्याकडून देण्यात येत आहे. यावर दिगंबर चव्हाण यांची प्रतिक्रिया अशी आहे की, गावातील माझ्या प्रमाणेच इतर ब-याच जणांची घरपट्टी थकीत आहे. त्यांच्या घराशेजारील रोडलाईट चालू आहेत. मग माझ्या घराशेजारील आमच्या वस्तीवरील दोन खांबावरील रोडलाईट का सुरू होत नाही. एकाला एक न्याय व दुसऱ्याला एक न्याय अशा प्रकारे जाणून-बुजून राजकीय भावना जोपासत तोंडे बघून ग्रामपंचायतीचे सरपंच येथील ग्रामस्थांना सेवा देत असल्याची मनातील खदखद दिगंबर चव्हाण यांनी व्यक्त केली.
सरपंच जरी मनामध्ये राजकीय मतभेद गृहीत धरून वागले तरी, कोरेगाव पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व सोळशी ग्रामपंचायतीचे ग्रामसेवक हे कोणाच्या राजकीय आदेशाखाली वागत आहेत असा संतप्त सवाल दिगंबर चव्हाण या ग्रामस्थांनी विचारला आहे. लवकरात लवकर न्याय मिळाला नाही तर सोळशी गावातील ग्रामस्थांसह सातारा जिल्हाधिकारी कार्यालया बाहेर तीव्र आंदोलन छेडणार असल्याचा इशारा दिगंबर चव्हाण व ग्रामस्थांनी दिला आहे.
एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशाला महासत्ता बनवण्याचे स्वप्न पाहत आहेत, तर दुसरीकडे अजितदादा पवार यांनी आपण विकासासाठी भाजपबरोबर जात असल्याची घोषणा शरद पवार यांची साथ सोडताना केली होती. हाच तो विकास आहे काय अशी विचारणा करत, अशा प्रकारच्या दुटप्पी गाव कारभारामुळे देश महासत्ता कसा होणार, असा गंभीर प्रश्न सोळशी गावासह संपूर्ण फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील जनतेसमोर उभा ठाकला आहे.







