सासवड सह फलटण तालुका हळहळला | स्टे वायरला इन्सुलेटर नसल्याने घडली दुर्घटना : प्रदीप झणझणे
फलटण, दि. २२ ऑक्टोंबर : ऐन दिवाळीत पाडव्याच्या दिवशी फलटण तालुक्यातील झणझणे सासवड गावात सकाळी ठिक ६.४५ वाजता किसन निवृत्ती जाधव यांच्या शेतातील गोठ्या शेजारी असलेल्या वीज महावितरणच्या विजेच्या खांबाला आधार देण्यासाठी जोडलेल्या स्टे वायरमधुन विजेचा करंट लागल्याने गोठ्यातील सहा गाईंचा दुर्दैवी अंत झाला. महाराष्ट्रातील शेतकरी अगोदरच निसर्गाच्या अनियमिततेमुळे अडचणीत असताना फलटण तालुक्यातील सासवड गावातील जाधव शेतकरी कुटुंबावर हा प्रचंड मोठा आघात झाला असल्याचे प्रदीप झणझणे यांनी सांगितले.
घटनास्थळी भेट दिली असता, स्टे वायर कुठेही इन्सुलेटरने जोडल्याचे दिसून आले नाही. जर विजेच्या खांबा मधून विद्युत प्रवाह स्टे वायर मधून पुढे जाऊ लागला तर त्या विद्युत प्रवाहाला जागीच थांबवण्याचे काम, प्रतिबंध करण्याचे काम हा इन्सुलेटर करत असतो. परंतु स्टे वायर इन्सुलेटरने जोडली नसल्यामुळे विजेचा प्रवाह थेट गोठ्यात असलेल्या गायींना लागून त्यांचा जागीच दुर्दैवी अंत झाला असल्याचे प्रजा गटाचे अध्यक्ष प्रदीप झणझणे यांनी प्रथमदर्शनी सांगितले.
झालेल्या दुर्दैवी घटनेचा वृत्तांत समजताच सासवड गावातील सर्व ग्रामस्थ मंडळी, तसेच पंचक्रोशीतील शेतकरी बांधव मोठ्या जमावासह जाधव यांच्या गोठ्यावर पोहोचले. सदर बातमी समजतात घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलीस स्टेशन व पशुवैद्यकीय अधिकारी यांनी ताबडतोब घटनास्थळी पोहोचून सदर घटनेची माहिती घेत तात्काळ पंचनामा केला. वीज महावितरणचे कर्मचारी देखील ताबडतोब घटनास्थळी पोहोचले. वीज महावितरणचे अधिकारी मात्र दुपारी साडे बारा ते एक वाजण्याच्या दरम्यान घटनास्थळी पोहोचले. वीज महावितरणचे अधिकारी आल्यानंतर घटनेची सर्व माहिती घेऊन त्यांचेकडून पुढील पंचनामा करण्यात आला.
ऐन दिवाळीच्या शुभ उत्सवामध्ये जाधव कुटुंबियांचा तोंडातला घास काढावा तशी ही घटना घडली. दैव बलवत्तर म्हणून सुदैवाने कोणतीही मनुष्यहानी झाली नाही अशीच चर्चा सर्वत्र सुरू होती. मागील आठ दिवसांपासून विजेच्या खांबावर बिघाड होत असल्याचे वीज महावितरणला वारंवार वेळोवेळी कळवल्याचे जाधव कुटुंबीयांनी सांगितले. वीज महावितरणच्या हलगर्जीपणामुळे सदर घटना घडली असल्याचे स्पष्ट मत जाधव शेतकरी कुटुंबीयांनी पोलीस स्टेशनचे अधिकारी, पशुवैद्यकीय अधिकारी, वीज महावितरणचे अधिकारी व गावातील ग्रामस्थ यांचे समक्ष जाहीर केले.
मृत झालेल्या गाईंचे प्राण पैशात मोजता येणार नाही, परंतु जाधव शेतकरी कुटुंबीयांना त्यांच्या हक्काची भरीव नुकसान भरपाई वीज महावितरणने त्यांना दिली पाहिजे अशी मागणी फलटण तालुका प्रजा गटाचे प्रदीप झणझणे यांचे सह, सासवड गावातील सर्व ग्रामस्थांनी एकमुखाने केली आहे. तसेच सदर दुर्घटना प्रकरणाची सखोल चौकशी होण्यासाठी प्रजा गटाच्या वतीने पाठपुरावा करणार असल्याचे प्रजा गटाचे अध्यक्ष प्रदीप झणझणे यांनी सांगितले.









