फलटण येथील भ्रष्ट व्यवस्थेमुळे डॉक्टर असलेल्या महिला भगिनीच्या झालेल्या दुर्दैवी मृत्यु प्रकरणात हत्या की आत्महत्या याबाबत अजुनही जनता संभ्रमात आहे. फलटणसह संपूर्ण महाराष्ट्रात विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या क्लीन चिट प्रकरणावर जोरदार टिकेची झोड उठवली आहे. मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या क्लीन चिटवर शिवसेना ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. अंधारेंनी या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे आणि सखोल चौकशीची मागणी केली आहे. डॉ. संपदा मुंडे यांच्या आत्महत्या प्रकरणात पोलिस तथ्य लपवत असल्याचा आरोप देखील त्यांनी केला आहे, तसेच सुसाईड नोट आणि हातातील हस्ताक्षरातील तफावत असल्याचे मत व्यक्त केले आहे. अंधारे यांनी अश्विनी बिद्रे प्रकरणाचा उल्लेख करून “निरीक्षक” हा शब्द सत्य उलगडू शकतो असे देखील सुचवले असुन मृत डॉक्टर महिला भगिनीस व तिच्या कुटुंबीयांना न्याय मिळवून देण्यासाठी सरकार व प्रशासनाकडे पारदर्शकतेची मागणी केली आहे.
सुषमा अंधारे म्हणतात, मुख्यमंत्र्यांनी न्यायाधीश होण्याच्या भानगडीत पडू नये. क्लीन चीट देण्याचं काम त्यांचं नाही. अंधारे पुढे असेही म्हणतात की, जेव्हा एखादी घटना घडते तेव्हा त्या ठिकाणी असलेल्या वस्तू जप्त केल्या जातात. लॅपटॉप, फोन आणि इतर गोष्टी सील केल्या जातात आणि त्याची माहिती गोपनीय ठेवली जाते. या वस्तू न्यायालयाच्या परवानगीने न्यायालयासमोर उघडायच्या असतात. आम्ही काही पोलीस अधिकारी आणि डॉ. धुमाळ यांचे कोणाकोणाशी संवाद झाले आहेत, याची सीडीआरची मागणी करत आहोत, मात्र याबाबत कोणतीही माहिती पुढे येत नसल्याचे सुषमा अंधारे यांनी म्हटले आहे.
सुषमा अंधारे यांनी सरकार व प्रशासनाकडून या प्रकरणाच्या हाताळणीच्या पद्धतीवर देखील सडकून टीका केली आहे. सत्य लपवण्याचा आणि आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला आहे. महाराष्ट्रासह संपूर्ण भारत देशामध्ये विरोधकांची टीकेची जोड उठल्यानंतर व जनतेमधील तीव्र असंतोष पाहिल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एसआयटीची स्थापना करण्याचे आदेश दिले असल्याची चर्चा सर्वत्र आहे. सुषमा अंधारे यांनी एसआयटीच्या विश्वासार्हतेवर सुद्धा प्रश्नचिन्ह उपस्थित केले आणि विचारले की ही फक्त औपचारिकता आहे का ?
बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात कवडगाव येथील मुंडे कुटुंबीयांची सुषमा अंधारे यांनी गुरुवारी भेट घेतली. यावेळी सरकार व प्रशासनाविषयीची मुंडे कुटुंबियांकडून सर्व कैफियत ऐकून घेतली व सर्व मुंडे कुटुंबीयांचे सांत्वन केले, त्यांना मानसिक आधार देऊन, आपण या लढ्यात पूर्णपणे मुंडे कुटुंबीयांच्या पाठीशी राहणार असल्याचे स्पष्ट केले. तसेच, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी मुंडे कुटुंबीयांचे बोलणं करून दिले. यावेळी उद्धव ठाकरे म्हटले की, आम्ही तुमच्या कुटुंबीयांसोबत आहोत. या प्रकरणात न्याय मिळवण्यासाठी आम्ही रस्त्यावर उतरू आणि न्यायालयीन लढाईही लढू, असे ठाम आश्वासन उद्धव ठाकरे यांनी मुंडे कुटुंबीयांना दिले आहे.
सुषमा अंधारे डॉ. मुंडेंना न्याय मिळवून देण्यासाठी आवाज उठवताना दिसत आहेत आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यासाठी त्या आग्रही असुन 3 नोव्हेंबरला सोमवारी त्या थेट फलटणमध्ये डॉ. महिला प्रकरण, तसेच विविध विषयांवर जाब विचारण्यासाठी येणार आहेत.







