फलटण : १ नोव्हेंबर २०२५ पासून फलटण तालुक्यातील गळीत हंगाम सुरु होऊन एक महिना उलटून डिसेंबर उजाडला तरी फलटण तालुक्यातील उपळवे येथील स्वराज व कापशी येथील शरयू साखर कारखान्याने ऊस दराची प्रति टन रक्कम जाहीर केली नाही. गळीत हंगाम सुरु होण्याअगोदर ऊस दर जाहीर करणे साखर कारखान्यांना बंधनकारक होते. परंतु दोन्ही कारखान्यांनी उचल जाहीर न करता ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी घेऊन कारखाने चालू केले आहेत. सातारा जिल्हयातील इतर साखर कारखान्याप्रमाणे शेतकऱ्यांच्या ऊसाला त्यांच्या घामाचा व हक्काचा प्रति टन ३५०० रुपये दर दयावा अशी मागणी फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या वतीने स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून करण्यात आलेली आहे.
जर प्रति टन ३५०० रुपये ऊस दर संबंधित दोन्ही साखर कारखान्यांनी जाहीर केला नाही तर दोन्ही साखर कारखान्यावर फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार काटा बंद आंदोलन करणेत येईल असा आक्रमक इशारा स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने देण्यात आलेला आहे. तसेच हे आंदोलन टाळण्यासाठी साखर कारखान्यांनी येत्या तीन दिवसामध्ये ऊसाची पहिली उचल ३५०० रुपये जाहीर करावी व त्याप्रमाणे ऊस बील शेतकऱ्यांना अदा करावे अशी मागणी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने करण्यात आलेली आहे. तसेच मागणीची दखल न घेतल्यास सातारा जिल्हयातील स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सर्व पदाधिकारी व शेतकरी मिळुन काटा बंद आंदोलन करतील व याची सर्वस्वी जबाबदारी दोन्ही साखर कारखाना प्रशासन व फलटण तालुका प्रशासन यांची राहील असे दोन्ही कारखान्यांना दिलेल्या निवेदनात स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने जाहीर करण्यात आले आहे.
स्वराज व शरयू दोन्ही कारखान्यांना निवेदन देताना स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सातारा जिल्हाध्यक्ष धनंजय महामुलकर, सातारा जिल्हा सरचिटणीस रवींद्र घाडगे, फलटण तालुका अध्यक्ष नितीन यादव, युवक राज्य प्रव्कते प्रमोद गाडे, फलटण शहर संघटक किसन शिंदे, साखरवाडी विभाग प्रमुख किरण भोसले, दादा जाधव, विकास जाधव, राहुल घाडगे, तेजसिंह जाधव, आदी पदाधिकारी उपस्थित होते.







