मुंबई : २४ डिसेंबर २०२५ रोजी, मुंबईत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) व महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन पक्षांची आगामी मुंबई महापालिकासह अन्य महापालिका निवडणुकांसाठीची युती घोषित झाली. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व महाराष्ट्र नवनिर्माण सेना अध्यक्ष राज ठाकरे दोघांनी या युतीची अधिकृत घोषणा संयुक्त पत्रकार परिषदेत केली. ही युती बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित होती. या सगळ्याची सुरुवात, राज ठाकरे यांनी एका मुलाखतीत दिलेल्या वाक्यातून झाली. कुठल्याही वादापेक्षा आणि भांडणांपेक्षा आपला महाराष्ट्र आणि मराठी माणूस मोठा आहे. हे ते वाक्य होतं. हे निव्वळ मुलाखतीतलं वाक्य नाहीये, तर ही एक तीव्र भावना असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटले आहे. तसेच या भावनेतुनच या दोन पक्षांनी एकत्र येत युतीची घोषणा केल्याचे सर्वांनी पाहिले आहे.
मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचा डाव महाराष्ट्रद्वेष्टे खूप दिवसांपासून करत असुन मराठी माणूस व मुंबईला वाचवण्यासाठी शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेना युती उदयास आल्याचे सांगत उद्धव ठाकरे यांनी भाजपला काय वाटतं ते भाजपने पहावं, मराठी माणसांना आणि मुंबईला काय हवं ते आम्ही दोघे, म्हणजे मी आणि राज दोघे पाहू असे खास ठाकरे शैलीत उत्तर दिले आहे.
आता कोणत्या पक्षाला कुठल्या आणि किती जागा मिळणार याची उत्तरं लवकरच मिळतील. पत्रकार परिषदेत यावर कुठलीही माहिती दोघांनीही सांगितली नाही, कारण त्या तांत्रिक बाबी आहेत असं कारण देण्यात आलं. शिवसेना व महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या युतीचं अस्तित्व हे किती जागा लढणार व कुठल्या जागा लढणार यासाठी महत्वाच नसुन, आज मराठी माणसाचं अस्तित्व मुंबईमधुन, तर उद्या राज्याच्या इतर भागातून मिटवण्याचा प्रयत्न सुरु आहे, त्या शक्तींना गाडून टाकण्यासाठीची ही युती आहे. त्यामुळे जागावाटप आणि त्याचा तपशील योग्य वेळी घोषित होईल असे राज ठाकरे यांनी स्पष्ट केले.
मुंबईचा महापौर हा महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि शिवसेना युतीचाच असेल आणि तो निर्विवादपणे मराठीच असेल असे रोखठोक उत्तर ठाकरे बंधुंच्या संयुक्त पत्रकार परिषदेतुन देण्यात आले.
राज ठाकरे पुढे म्हणाले की, आज वर्तमानपत्रं असोत किंवा वृत्तवाहिन्या, त्यांचे बहुसंख्य संपादक, पत्रकार आणि तिथे काम करणारी इतर मंडळी ही कडवट मराठी प्रेमी आहेत. आणि त्यांना मराठी भाषेच्या विरोधात आणि मराठी माणसाच्या विरोधात जे षडयंत्र सुरु आहे ते आवडत नाहीये. त्यातले अनेक जणं त्यांचा रोष त्यांच्या पत्रकारितेतून व्यक्त करतात, तर काही खाजगीत व्यक्त होतात. माझी त्या सगळ्यांना विनंती आहे की यावेळेस तुमच्या मालकांना आणि त्यांच्या मालकांना काय वाटतं यापेक्षा तुमच्या सद्सद्विवेक बुद्धीला काय वाटतं, पटतं तेच मांडा आणि तेच बोला. ही दोन पक्षांची लढाई नाही तर ही मराठी माणसांची लढाई आहे. संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीच्या वेळेस जशी तत्कालीन माध्यमं मराठी माणसाच्या पाठीशी उभी राहिली तसं यावेळेस तुम्ही उभे रहा. कारण मराठी भाषा आणि मराठी माणूस टिकला तर तुमचं अस्तित्व टिकेल.







