फलटण : फलटण शहरामध्ये नगरपरिषद निवडणुकीचं वातावरण तापू लागलेलं आहे. फलटण तालुक्यात एकुण चार कारखाने आहेत. निवडणुका लढायचं आणि जिंकायचंय म्हटलं की नेत्यांना शंभर हत्तींचं बळ येतं, परंतु शेतकऱ्यांना त्यांच्या घामाच्या मेहनतीने पिकवलेल्या उसाला दर द्यायचा म्हटलं की मेटाकुटीला यायचं. शेतकऱ्यांचा प्रपंच सुरळीत चालण्यासाठी व शेतकऱ्यांच्या मेहनतीच्या घामाचं मूल्य ठरवणारा हा ऊस दर जाहीर करताना, “हे शंभर हत्तीचे बळ नेमकं जात कुठं ?” असा प्रश्न संपूर्ण फलटण तालुक्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना पडल्याशिवाय राहत नाही. नुकताच काही दिवसांपूर्वी श्रीराम सहकारी साखर कारखान्याने 3300 रुपये ऊस दर जाहीर केला आणि जणूकाही ऊस दराबाबत कारखान्यांनी शेतकऱ्यांशी धरलेला अबोला बंद होऊन ऊस दराबाबतची कोंडी एकदाची फुटली. अजूनही तीन कारखान्यांचा शेतकऱ्यांशी अबोला सुरूच असल्याचे प्रजा गटाचे अध्यक्ष प्रदीप झणझणे यांनी सांगितले.
दत्त इंडिया, स्वराज आणि शरयू या कारखान्यांचं ऊसदराबाबतचं मौन व्रत अजून काही संपलेलं दिसत नाही. कारखान्यांना ऊस दर केव्हातरी जाहीर तर करावाच लागणार आहे, मग तो नियमानुसार व नैतिकतेनुसार शेतकऱ्यांचा ऊस गाळपासाठी घेण्या अगोदर का नाही. एकीकडे महाराष्ट्र राज्याचे जबाबदार मंत्री असलेले चंद्रशेखर बावनकुळे त्यांच्या नेत्यांना व कार्यकर्त्यांना सांगत आहेत की, निवडणुकांना कितीही खर्च लागू द्या, निवडणूक आयोगाला काय उत्तर द्यायचं ते आम्ही पाहतो, त्याची काळजी नेत्यांनी किंवा कार्यकर्त्यांनी अजिबात करू नये. मग महाराष्ट्र राज्यात जेवढेही कारखाने आहेत, त्या कारखानदारांना हे मंत्री महोदय कधी सांगणार की, मेहनतीचे काम करुन घाम गाळून उसाची शेती पिकवणाऱ्या शेतकऱ्यांसाठी उच्चांकी ऊस दर द्यायला कितीही खर्च झाला तरी मागेपुढे पाहू नका. शेतकऱ्यांना ऊस दर देताना दुबळे होऊ नका. शेतकऱ्यांसाठी कितीही खर्च होऊ द्या, त्याची काळजी महाराष्ट्र सरकार करेल असं एखादे मंत्री जबाबदारीने का सांगत नाहीत असा संतप्त सवाल प्रदीप झणझणे यांनी उपस्थित केला.
फलटण नगर परिषदेवर सत्ता आपलीच असली पाहिजे, जिल्हा परिषद, पंचायत समितीवर सत्ता आपलीच असली पाहिजे असा अट्टाहास प्रत्येक नेत्याचा असतो, असा अट्टाहास असायला देखील कोणाचीच काही हरकत नसावी. पण शेतकऱ्याला त्याच्या मेहनतीच्या घामाचं मूल्य उच्चांकी स्वरूपात देण्यासाठी असा अट्टाहास का नसतो, हीच फलटण तालुक्यातील शेतकऱ्यांसाठीची सर्वात मोठी शोकांतिका आहे. शेतकरी यामधून कधी धडा घेणार, कधी शिकणार, कधी प्रगल्भ होणार. फलटण शहरात राहणारा नागरिक हा शेतकरी नाही काय. आता वेळ आलेली आहे, प्रसंगावधान ओळखून फलटणकर शेतकऱ्यांनी कारखान्यांना सुचित करायची वेळ आली आहे की, फलटण तालुक्यात चारही कारखान्यांनी एक मुखाने आधी 3600 रुपये ऊस दर जाहीर करावा व नंतरच निवडणुकांच्या प्रचाराची धुरा सांभाळावी.







