फलटण : महाराष्ट्राच्या वैचारिक आणि लोकशाही परंपरेला तडा देणाऱ्या पद्धतीने (एकुण १७ जागांपैकी तब्बल ६ जागा) विधान परिषद निवडणुका बिनविरोध होत असतील, तर तो लोकशाहीचा विजय नसून पराभव आहे. विधान परिषदाही ग्रामपंचायतीप्रमाणे बिनविरोध होणे हे महाराष्ट्राला भूषणावह नसून राज्याच्या लोकशाही मूल्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण करणारे असल्याची परखड टीका प्रजा गटाचे अध्यक्ष प्रदीप झणझणे यांनी केली आहे.
प्रदीप झणझणे म्हणाले की, महाराष्ट्र हा शिव, शाहू, फुले आणि आंबेडकर यांच्या विचारांचा वारसा जपणारा प्रदेश आहे. येथे मतभिन्नतेचा आदर, विचारांची देवाणघेवाण आणि लोकशाहीतील सशक्त स्पर्धा हीच खरी ओळख राहिली आहे. अशा राज्यात विधान परिषदेसारख्या महत्त्वाच्या सभागृहाच्या निवडणुका या अप्रत्यक्षरित्या दबावतंत्राने व आमिषाने बिनविरोध होणे ही चिंतेची बाब आहे.
गावाच्या एकोप्यासाठी ग्रामपंचायती बिनविरोध होऊ शकतात, पण राज्याच्या धोरणांवर चर्चा करणारी, सरकारला जाब विचारणारी आणि सत्तेला उत्तरदायी ठेवणारी विधान परिषद जर स्पर्धेशिवाय भरली जाऊ लागली व एकाच घरात दोन दोन, तीन तीन, लोकप्रतिनिधी आमदार, खासदार, आदी पदांवर नियुक्त होऊ लागले तर ही लोकशाहीची ताकद नसून तिची कमकुवत बाजू ठरेल, असे प्रदीप झणझणे यांनी स्पष्ट केले.
विधान परिषदेसारख्या महत्त्वाच्या लोकशाही निवडणुकीत पक्षाच्या भूमिकेला आणि कार्यकर्त्यांच्या भावनांना डावलून उमेदवारी अर्ज माघारी घेणे हे लोकशाहीस घातक असल्याची तीव्र प्रतिक्रिया प्रजा गटाचे अध्यक्ष प्रदीप झणझणे यांनी व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले की, निवडणूक ही केवळ व्यक्तीची नसून विचारांची आणि पक्षाच्या लोकशाही प्रक्रियेची असते. त्यामुळे पक्षाला विश्वासात न घेता किंवा जनतेसमोर स्पष्ट भूमिका न मांडता उमेदवारी मागे घेणे ही लोकशाही मूल्यांना बाधा पोहोचवणारी बाब असून अशा प्रवृत्तीमुळे राजकीय व्यवस्थेवरील जनतेचा विश्वास कमी होण्याचा धोका निर्माण होतो. त्यामुळे स्वतःच्या पक्षाशी, पक्षाच्या कार्यकर्त्यांशी व जनतेचं हित जपणाऱ्या लोकशाहीशी प्रतारणा करणाऱ्या उमेदवारांना आजन्म निवडणूक लढवण्यासाठी बंदी घालुन, लोकशाहीची मूल्ये सुरक्षित ठेवण्यासाठीचा कायदा अस्तित्वात आला पाहिजे.
झणझणे यांनी पुढे म्हटले की, निवडणूक म्हणजे केवळ उमेदवार निवडण्याची प्रक्रिया नसून विचारांची परीक्षा असते. मतदारांना पर्याय नाकारून बिनविरोध निवडींचा गौरव केला जात असेल, तर लोकशाहीचा आत्माच कमकुवत होईल. विरोधी मतांना संधी न देता सत्तेचा मार्ग मोकळा करणे हे कोणत्याही प्रगल्भ लोकशाहीला शोभणारे नाही.
“महाराष्ट्र सरकारने आणि सर्व राजकीय पक्षांनी आत्मपरीक्षण करण्याची वेळ आली आहे. बिनविरोध निवडणुका हा अभिमानाचा विषय नसून लोकशाहीतील स्पर्धा कमी होत असल्याचा इशारा आहे. जनतेला पर्याय, विचारांना व्यासपीठ आणि लोकशाहीला बळ देणारी स्पर्धा जिवंत ठेवणे हीच खरी काळाची गरज आहे,” असे ठाम मत प्रदीप झणझणे यांनी व्यक्त केले.
विधान परिषद निवडणुकीच्या एकूण १७ जागांपैकी ११ जागांकरिता निवडणूक होत आहे. लोकशाहीचे खरे सौंदर्य हे अशाप्रकारे होणाऱ्या निवडणुकीच्या संघर्षात, विचारांच्या मतभेदात आणि जनतेच्या मतातून निर्माण होणाऱ्या जनादेशात असते. त्यामुळे विधान परिषद निवडणुका स्पर्धात्मक होणे हेच महाराष्ट्राच्या लोकशाही परंपरेला साजेसे असल्याचेही प्रदीप झणझणे यांनी अधोरेखित केले.







