विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर क्षणाचाही विलंब न करता लाडक्या बहिणींना निधी देऊन भरमसाट मते घेताना अविचार ; मात्र कोलमडलेल्या शेतकऱ्याला आधार देण्यासाठी पंचनामे करून (वेळ खाऊ प्रक्रियेनंतर) मदत करण्याची सरकारची वैचारिक भुमिका परस्पर विरोधी.
लोकसभा 2024 च्या निवडणुकीत महाराष्ट्र राज्यामध्ये महायुतीचा धुरळा उडाला होता. 48 खासदार संख्या असलेल्या महाराष्ट्र राज्यात महायुतीच्या केवळ 17 जागा निवडून आल्या होत्या. मतदारांचा कल ओळखत विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर घाई गडबडीत महायुतीने महाराष्ट्र राज्यातील विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी लाडकी बहीण योजना अमलात आणली. लाडक्या बहिणींनी भरघोस मतदान करत महायुतीला विधानसभा निवडणुकीत न भूतो, न भविष्य असा प्रचंड मोठा विजय मिळवून दिला.
मात्र आता याच लाडक्या बहिणींना सावत्र पणाची वागणूक महायुती सरकारकडून मिळत असल्याची चर्चा सुरू आहे. विधानसभा निवडणुकी अगोदर कोणत्याही अटी शर्ती निकष यांचा अभ्यास न करता, लाडक्या बहिणी पात्र आहेत की नाहीत, याचा कसलाही विचार न करता सरकारकडून सरसकट तत्वावर प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यात प्रत्येकी 1500 रुपये याप्रमाणे रक्कम जमा करण्यात आली होती.
ज्या बहिणींच्या जीवावर हे महायुतीचं सरकार निवडून आलं, त्याच बहिणींना बोगस म्हणण्याचं पाप, तसेच अपात्र बहिणी म्हणून संबोधत त्यांना योजनेतून डावलण्याचं पाप हे महायुती सरकार करत आहे. महायुती सरकार लाडक्या बहिणींना बोगस म्हणत आहे, मग त्याच बोगस लाडक्या बहिणींची मतं घेतलेले सरकार पात्र कसं, असा प्रश्न जनसामान्यांकडून विचारला जाऊ लागला आहे. लाडक्या बहीणीला बोगस म्हणणारे सरकारच बोगस आहे, अपात्र आहे. महायुती सरकारला खुर्चीवर बसून सत्ता उपभोगण्याचा कोणताही अधिकार नाही. त्यांनी लाडक्या बहिणींच्या व या जनतेच्या डोळ्यात धुळ फेकण्याचं काम केलं आहे. महायुती सरकारमधील सर्व मंत्र्यांनी राजीनामे देऊन खुर्चीवरून पाय उतार व्हावे अशी मागणी आता जनतेमधून जोर धरू लागली आहे.
मराठवाड्यामध्ये अतिवृष्टीमुळे, पूरस्थितीमुळे तेथील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालेलं असताना महायुती सरकार तिथे पंचनामे झाल्यानंतर केंद्राकडून बाधितांना मदत करण्याचं आश्वासन देत आहे. खरंतर या ठिकाणी आता सरसकट व तातडीने मदत देणे अपेक्षित असताना महायुती सरकार पंचनामे होण्याच्या वेळ खाऊ प्रक्रियेची वाट पाहत आहेत. विधानसभेच्या तोंडावर लोकांना आवश्यकता नसताना केवळ निवडणूक जिंकण्यासाठी प्रत्येक महिला भगिनींच्या खात्यात कोट्यवधी रक्कम जमा करत अमलात आणलेली लाडकी बहीण योजना व दुसरीकडे निवडणुका नसताना आत्ता सध्या महापुराने ग्रस्त असलेल्या लोकांचा आक्रोश पाहून देखील त्यांना तातडीने मदत न करणारे महायुती सरकार, असा एकूण विरोधाभास पाहून मराठवाड्यासह महाराष्ट्र राज्यातील जनता संतप्त झालेली आहे. फलटण तालुक्यातील जनता देखील दबक्या आवाजात सरकाच्या या परस्परविरोधी धोरणांचा निषेध करत आहे. एकंदरीत जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम महायुती सरकार करत असल्याची चर्चा जनतेमध्ये सुरू आहे.









