प्रदिप झणझणे, संस्थापक संपादक – प्रजा जन
आजच्या दैनंदिन जीवनामध्ये प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्यातरी समस्येने चिंताग्रस्त असतो आणि त्यातून सोडवणूक व्हावी यासाठी तो प्रत्येक जण देवाकडे काही ना काहीतरी मागतच असतो. सर्व पर्याय संपल्यानंतर सर्वात शेवटी आपल्याला दिसतो तो परमेश्वर. प्रत्येकाची आशा अपेक्षा त्याच्या पायाशी लागून राहिलेली असते की तो सर्व संकटातून सोडवेल. कोण नोकरी मागत असतो, कोण जमीन मागत असतो, कोण गाडी मागतो, कोण पैसा मागतो, कोण बंगला मागतो, कोण काय मागेल याला काही अंत नाही.
परमेश्वराकडे मागणी मागायला कोणीही अडवले नाही. परंतु जो नित्य नेमाने देवाचे नामस्मरण करतो, दैनंदिन जीवनात आपलं काम करत असताना देखील त्याची आठवण सातत्याने अखंडपणे करत असतो त्यालाच परमेश्वराकडे हक्काने मागण्याचा अधिकार प्राप्त होतो. याला जोडुन येथे एक उदाहरण देता येईल. एक मित्र पैशाची नड पडल्यानंतर दुसऱ्या मित्राला भेटायला जातो. मग तो दुसरा मित्र त्याला म्हणतो इतके दिवस कुठे होता, आज इतक्या दिवसांनी कशी काय आठवण झाली, आज कसा काय फिरकलास ?मग हे जर मित्र विचारू शकत असेल तर ही गोष्ट परमेश्वराच्या लक्षात येत नसेल का ? अडचण पडल्यानंतर मंदिरात गेल्यावर परमेश्वर देखील असा विचार करत नसेल का ? आज कसा काय बुवा फिरकलास. यासाठी आपल्या वागण्या बोलण्यामध्ये, व्यवहारामध्ये सातत्य असले पाहिजे, परमेश्वराची सेवा सातत्याने केली पाहिजे, निष्ठेने केली पाहिजे. अडचण पडल्यानंतरच एखाद्याची आठवण होणे योग्य नाही.
एखादा दाता भेटल्यानंतर त्याला काय मागावे हे देखील आपल्याला समजलं पाहिजे. तुकाराम महाराजांची पांडुरंगावर नित्यनेमाने अपार श्रद्धा होती, निष्ठा होती, विश्वास होता, भक्ती होती. त्यांनी ज्यावेळी पांडुरंगाकडे मागणी केली त्यावेळी काही छाटछुट, बारीक-सारीक मागणी केली नाही. पांडुरंगाकडे त्यांनी अभंगामधून सर्वोच्च प्रतीची मागणी केली. हेचि दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. तुकाराम महाराज म्हणतात, परमेश्वरा माय बापा, तू बरोबर असल्यावर कशाचीच उणीव नाही. परमेश्वरा तूच पाहिजे मला. ज्यावेळी हा भाव तयार होतो तेव्हा हीच मागणी सर्वोच्च प्रतीची ठरते.
जगज्जेता सिकंदर सर्व जग जिंकूनही हरला. त्याच्या कर्तुत्वाला जर परमेश्वराच्या भक्तीची, नामस्मरणाची जोड असती तर त्याच्यासारखा दुसरा झाला नसता. प्रत्येकाने या गोष्टीची जाणीव ठेवून जगले पाहिजे की आपण या जगात कसे आलो, आपल्याला कुठे जायचं आहे, आपलं अस्तित्व काय आणि किती आहे, कसल्या आणि कशाच्या हुशारक्या आपण मारतो. जगात येताना काय घेऊन आलो आपण, काय आहे इथे आपलं आणि जग सोडण्याची वेळ आल्यानंतर स्वतःबरोबर काय घेऊन जाणार आहोत आपण. या सर्वाचा सारासार विचार करून राहिलेल्या आयुष्यात इथून पुढे कोणाबाबतही राग-द्वेष-मत्सर, मनामध्ये न ठेवता सर्वांशी प्रेमाने वागणे आवश्यक आहे, आयुष्य जगत असताना जे काही आपल्याला करायचं आहे ते चांगलं केलं पाहिजे, जे काही कोणाला द्यायचं असेल ते चांगलं दिलं पाहिजे. तुमच्याकडे देण्यासारखं काही नसेल तर कोणाला काही देऊ नका, पण कोणाचाही अपमान करू नका, कोणालाही दुखवू नका. द्यायचंच असेल तर आपल्याकडे जी सर्वोच्च देण्यासारखी वस्तू आहे ती म्हणजे प्रेम ती द्या, कोणाच्याही विश्वासाला कधी तडा जाऊ देऊ नका, कोणाशी वाईट वागू नका, कोणाचं लुबाडून खाऊ नका. मकर पहा, तुमचं व्यक्तिमत्त्व पराकोटीला जाऊन पोहोचलेले असते आणि एकदा का तुम्ही परमेश्वराशी म्हणजे तुमच्या आत्म्याशी, स्वतःशी प्रामाणिकपणे व निस्वार्थीपणे एकरुप झाला की परमेश्वरच तुमच्यावर प्रेम करायला लागतो.
एखादा गुन्हा केल्यानंतर आणि तो पचवल्यानंतर चोर म्हणतो, मला गुन्हा करताना कोणीही पाहिलेलं नाही. त्यामुळे मला काही धोका नाही. परंतु त्याला पाहणारा त्याच्या शरीरात, हृदयात असलेला आत्मा म्हणजेच परमात्मा हा त्याला पाहत असतो. कायद्याने जरी त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळाली नाही तरी शेवटी परमेश्वर हिशोब करतोच. महाभारतातील श्रीकृष्णाप्रमाणे सत्याची सर्व सूत्रे हातात घेतो आणि न्यायाची वेळ पुन्हा घेऊन येतो. असा संवाद आपल्या सर्वांमध्ये, प्रत्येकाच्या घराघरात, गावातील कट्ट्यांवर अशा प्रकारची चर्चा कायम होत असते. त्यामुळे वाईट विचार सोडून सत्य मार्गाने सकारात्मक रहा. भगवंताच्या नामात रंगून जा आणि आपलं कर्म प्रामाणिकपणे करत रहा. सर्व काही चांगलंच होईल, मंगलमय होईल.









